ठाणे : ‘‘डिजी ठाणे’ हा प्रकल्प म्हणजे चेहराविरहित प्रशासनाकडे सुरू केलेली महत्त्वपूर्ण वाटचाल असून, या प्रकल्पामुळे नागरिकांचे हेलपाटे कमी होतील,’ असा विश्वास महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केला. महापालिकेच्या वतीने ‘डिजी ठाणे’ प्रकल्पांतर्गत महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. या वेळी अतिरिक्त आयुक्त (२) अशोककुमार रणखांब हेही उपस्थित होते.
या वेळी बोलताना महापालिका आयुक्त जयस्वाल यांनी, डिजी ठाणे प्रकल्पांतर्गत कार्डधारकांना ज्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत, त्या सर्व सुविधा पुरविणाऱ्या संस्था, कंपन्या यांच्याशी समन्वय साधून त्यांना या प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याच्या सूचना दिल्या. जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत राज्य सरकारने अधोरेखित केलेल्या सर्व सुविधा ऑनलाइन करण्याचे आदेश त्यांनी माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. ‘नागरिकांना महापालिकेच्या कार्यालयामध्ये वारंवार हेलपाटे मारण्याची गरज पडणार नाही, यासाठी महापालिकेच्या वतीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करा,’ अशा सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या.
यासाठी महापालिका मुख्यालयामध्ये स्वतंत्र कक्ष तयार करून त्या ठिकाणी सर्व आवश्यक सुविधा पुरविण्याचे आदेश देतानाच, महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सर्व प्रकल्पांचे एकात्मीकरण करण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्याच्या सूचना त्यांनी या वेळी दिल्या.